उध्दव ठाकरेंचा हल्लाबोल, पाच राज्यांतील पराभव पंतप्रधानांचाच!

Foto

मुंबई- राजस्थान, छत्तीसगड, मध्य प्रदेशसह पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपचा झालेला दारूण पराभव हा पंतप्रधानांचाच आहे, अशी टीका करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदी व भाजपवर पुन्हा निशाणा साधला आहे. 

 

पाच राज्यांत जे महाभारत घडले त्यात पांडव कोण, कौरव कोण या फंदात आम्हाला पडायचे नाही;पण अन्याय आणि असत्याचा पराभव झाला. गर्वहरण झाले व अहंकारही मारला गेला. कोण गांधी, कोण बादल, कोण ठाकरे, कोण जनता? सर्व काही मी आणि मीच आहे. त्या मीपणाचा पराभव शक्‍तिमान जनतेने केला. हा पराभव पंतप्रधानांचाच आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी तीन राज्यांतील विजय नम्रपणे स्वीकारला. भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचे त्यांनी आभार मानले.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी तर पंडित नेहरू, इंदिरा गांधी व राजीव गांधींचे देश उभारणीतील योगदान मानायला तयार नाहीत. हा पराभव मोदींचा पराभव नसल्याचे आता सांगितले जाते.मोदी हे प्रचारात उतरले नसते तर हा पराभव स्थानिक नेतृत्वाचा व अंतर्गत तिकीट घोटाळ्याचाच ठरला असता. पण पंतप्रधान सर्व फौजफाटा घेऊन उतरले. संपूर्ण केंद्रीय मंत्रिमंडळ प्रचारात उतरवले, त्यामुळे हा पराभव पंतप्रधानांचाच आहे, अशी टीकाही ठाकरे यांनी मुखपत्रातील अग्रलेखातून केली आहे.